Skip to main content

.... अवघे धरू सुपंथ

सकाळचे साडे नऊ , धडाम! ८५५५, निफ्टी खालच्या वाटोळ्याला (सर्किट) निपचित पडला. अपशकुनी १३ तारखेचा शुक्रवार वाकुल्या दाखवत होता. पोर्टफोलिओ बघण्याची ना हिम्मत नव्हती आणि ना उपयोग.  त्याहीपेक्षा भांडवली बाजाराच्या विरोधकांमधील सर्वकालीन अग्रणींपैकी एक असलेल्या सौभाग्यवतींना काय तोंड द्यायचं ह्याचा विचार करून मेंदूचा भुगा होता.धीर करून तिच्या भरवशाच्या सोन्याचा दर बघितले , ते पण पडलेले ... जरा हायसं वाटलं. निदान - "तरी मी सांगत होते , शेअर्स वर पैसे लावण्यापेक्षा सोनं घे" हे ऐकून घ्यावं लागणार नाही.
करोना विषाणू लागण झालेली लोकं कमी आणि गुंतवणूकदार जास्त मारणार हे खरं ठरणार बहुतेक. 

पण तसाही सगळीकडे अक्षरश: हाहाकार माजला आहे. २१ व्या शतकात शहरं विलगित केली जातात हा धक्का पचण्याआधीच प्रांताच्या विलगीकरणाची आणि त्या मागोमाग देशांच्या सीमा बंद झाल्याच्या बातम्या धडकल्या. अगदीच अकल्पित घडलं. गुंतवणूकदारांचं सोडाच, पण सगळे उद्योगधंदे ठप्प झाले आहेत.प्रवास, बाजारपेठा, चित्रपटगृहे, शाळा, महाविद्यालये ह्यांच्या बंदीमुळे आर्थिक चक्र थांबलं आहे. ऑलम्पिक सुद्धा रद्द करण्याची पाळी आली आहे. अनेक देशांच्या अर्थव्यवस्था कोलमडून पडायच्या मार्गावर आहेत. 

४ महिने झाले तरी ह्या रोगाचा संसर्ग थांबवण्याचा काही उपाय सापडत नाही आहे. विषाणु नाहीसा करेल असं औषधही सापडत नाही आहे. प्रतिबंधक लस बनविणे दूरच राहिलं , ह्याचा उगम कसा झाला हे कोडंही उलगडलं नाही आहे. हा निसर्गाचा कोप आहे, की कोणतं  जैविक अस्त्र, का कोणाचा फसलेला  प्रयोग? ह्यातून सुटका होणार का? आणि झाली तरी कधी होणार? का कधीच होणार नाही? इतकी सगळी वैज्ञानिक प्रगती केली, ती सारी निरर्थकच का? माणूस एवढा हतबल क्वचितच झाला असेल. 

पण सारंच काही निराशादायक नाही. सर्वात आधी स्वत:चा जीव धोक्यात घालून करोनाग्रस्तांवर अहोरात्र उपचार करणारे वैद्यकीय क्षेत्रातील लोकं ! त्यांचा सेवाभाव, त्याग आणि रुग्णसेवेप्रती बांधिलकी सारं काही दीपवून टाकणारं  आहे. तसेच रोगराई पसरू नये म्हणून आमच्यासारखाय बेजबाबदार लोकांनी केलेला कचरा युद्धपातळीवर हटवणारे सफाई कर्मचारी ह्यांच्यासाठी ही नकळत हात जोडून जातात. त्यांच्या कामामुळे इतरांनाही नवी उमेद आणि भरवसा मिळतो आहे. जगभरातल्या सामाजिक संस्थांनी अनेक चांगल्या सवयीचा केलेला  पाठपुरावा , सर्वांमध्ये केलेली जागृती आणि लोकांनी त्याला दिलेला प्रतिसाद तर विलक्षण आहे. ह्या अथक प्रयत्नांमुळेच रोगातून ठणठणीत बरे होण्याचे प्रमाणही खूप जास्त आहे. आणि हीच माझ्यादृष्टीने सर्वात मोठी आशा आहे.

निसर्गाच्या अनेक वरदानांपैकी एक म्हणजे सामुदायिक प्रतिकारशक्ती (Community Immunity / Herd  Immunity  - https://en.wikipedia.org/wiki/Herd_immunity ). रोगांतून बरे होताना सजीवांचे शरीर रोगांविरुद्ध एकप्रकारची प्रतिकारशक्ती तयार करतात. ही प्रतिकारशक्तीची उत्क्रांती बऱ्या झालेल्या लोकांपर्यंतच मर्यादित न राहता इतर लोकांमध्येही पसरते. जेवढे जास्त लोक रोगाची लागण होऊन बरे होतील, तेवढी प्रतिकारक्षमता त्या प्रजातीमध्ये अधिक बळकट होते. आणि अखेर तो रोग निष्प्रभ ठरतो. काही वेळा कालांतराने अशा रोगांचा मागमूसही राहत नाही. आणि हया करोना विषाणूच्या बाबतीतही असंच काहीतरी होईल अशी मला आशा आहे.

खरं म्हणजे ही शिकवण तर आपल्याला आधीच मिळालेली आहे . एकमेकां साह्य करू अवघे धरू सुपंथ ! पण क्षुल्लक गोष्टींच्या मागे धावताना महत्त्वाच्या गोष्टी विसरून जाण्याचा बेजबाबदारपणाही आपल्या अंगात भिनलेला आहे. मग आपणाला वठणीवर आणण्यासाठी निसर्गदेवता अशा लीला तर दाखवत नाही ना?
माझ्या मते ह्यातून अजूनही अनेक काही शिकण्यासारखे आहे. मरणाच्या दारात जाऊन आल्यावरच आयुष्याचे खरे मोल कळते. जर जग अशा एखाद्या विषाणूने नष्ट होऊ शकते, तर मीपणा कसला बाळगायचा? ह्या खोट्या गोष्टींसाठी लोकं कादुरावयाची? पैसा / मालमत्ता काही कामी येईल का अशा वेळी?  त्यापाठी मन:शांती आणि आरोग्याची कितीहेळसांड करायची? जात/धर्म/भाषा ही बंधनं आपली सामुदायिक प्रतिकारशक्ती ( किंवा विषाणू ) बघत नसेल तर त्यापायी आपण तरी का आपलं आयुष्य तणावपूर्ण का करायचं? आनंदाने जगा व जगू द्या ना! आणि हो प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी, निकोप आरोग्यसाठी प्रसन्न मनही हातभारच लावेल. 

चला तर मग,समभाग थोडे फार सावरलेच आहेत. सर्वे सन्तु निरामय अशी प्रार्थना करून निरोप घेतो. क जीवनसत्वाची गुटी (लिंबू - पाणी) घेण्यासाठी बायको बोलावते आहे. साबणाने हात धुऊन गेलेलं बरं. 




Comments

योगेश said…
खूप छान अमित! लिहीत रहा :)
umeed-kiran said…
मस्त रे अम्या!!
Anonymous said…
Super Amit !! Keep writing. Read something beautiful after long time. Thanks for sharing.
Anonymous said…
सुंदर
amity said…
Thank you all. 🙂
Anonymous said…
Very well written Amit.. thought provoking.

-Rajeshwari

Popular posts from this blog

मे महिना

शाळेत असताना माझा सगळ्यात आवडता महिना होता तो मे महिना! कारणं तर सगळ्यांनाच माहिती आहेत. निकाल लागलेला असल्याने पुढच्या वर्गात जाण्याची खात्री असायची, घरात सगळे नातेवाईक, पाहुणे असल्याने खेळायला/उनाडक्या करायला अख्खी टोळी असायची, त्यावेळी तरी पुढच्या वर्गांच्या शिकवण्या/संस्कार वर्ग/उन्हाळी शिबिरं असले काही प्रकार नव्हते आणि ह्या सगळ्याला असायची ती कोकणाची पार्श्वभूमी. आंबे, फणस, काजू, जांभळं, करवंद ह्यांचा रतीब, गाज ऐकत वेळेवर फिरणं, किल्ले बांधणं, शंख-शिंपले गोळा करणं, उकाड्याने हैराण झालो की एखादे काका/मामा आइस्क्रीम खायला देतील ह्या आशेवर राहणं, वळवाच्या पावसात चिंब होणं हे सगळं मनोसोक्त भोगायचे ते दिवस होते. इतक्या वर्षांनंतर परत मे महिन्यात कोकणात जायची संधी मिळाली. मारामारी करून कोड अप्रूव्ह करून घेतला आणि सरळ गोवा गाडी पकडून कणकवली गाठली. तसंही महिन्यातून एकदा जाणं होतंच, पण ते २, जास्तीत जास्त ३ दिवस. ह्या वेळी अख्खा आठवडा हातात होता. २ दिवस सिंधु-महोत्सव बघत आराम केला. कार्यक्रम/आयोजन चांगलं होतं पण मागच्याच आठवड्यात नाट्यमहोत्सवाची धमाल केलेल्या नाट्यवेड्या (नाट्यरसिक नव्हे)...

मुक्काम पोस्ट बोस्टन..

If you can not see the MARATHI text below, then please use following links Part I Part II काल दुपारी (नेहमीप्रमाणे) काम नसल्याने खिडकीतून बाहेर बघत होतो..आभाळ कसं अगदी भरून आलेलं आणि सोसाट्याचा वाराही सुट्लेला.. क्षणभर वाटलं की मस्तपैकी टपरीवर जावून कटिंग चहा मारावा.. अशा वातावरणात चहाची तल्लफ येण्यात चूक काहीच नाही.. फक्त त्यासाठी कुठेतरी भारतात असायला हवा होतो.. :( बघता बघता बोस्टनमधे येवून तीन महिने होत आले.. पण खरं पाहू जाता फार दूर आलोयं असं वाटतं नाही.. आणि तसं वाटण्यासारखी परिस्थिती पण नाही.. मागच्याच शनिवारी माझा एक मित्र कणकवलीहून आला, येताना माझ्या आईने दिलेले बेसनचे लाडू घेवून आला.. लगेचच मी घरी फोन करून ते मिळाले म्हणून कळवलं.. आणि आईने पण नेहमीप्रमाणे, 'कसे झालेत?, सगळ्या मित्रांना दे' असं सांगितलं.. जणू काही मी सांगलीत हॉस्टेलमधेच होतो.. आणि ह्या शनिवारी तर न्यू इंग्लड होळी पण साजरी झाली. पुण्यातून कूल कॅब ने मंदारकडे निघालो तेव्हा जरा धाकधूक होती, टॅक्सीवाला रात्री ११ वाजता मुंबईत पोहचल्यावर उगीचच इकडे तिकडे फिरवून जास्त भाडं तर नाही ना मागणारं?, पण दिवसा ढवळ्या ...

मार्गे दलाल पथ...

पैसा पैशाला ओढतो, असं ऐकून एक गरीब माणूस मंदिरात गेला, हातातला एक रुपया दानपेटीवर धरून वाट बघू लागला, आपण २-३ रुपये ओढले तरी काही कमी फायदा नाही असा त्याचा हिशोब होता. पाच एक मिनिटांतच त्याच्या हातातून तो रुपया सुटला आणि दानपेटीत गेला.. ते पाहून तो उद्गारला, "अरेच्च्या! पैसा पैशाला ओढतो हे खरं आहे.. पण कोणाचा पैसा कोणाच्या पैशाला ओढेल हे मात्र सांगता नाही येणार" लहानपणी ऐकलेल्या ह्या गोष्टीचा अर्थ मला शेअर-बाजारात नव्याने समजला... मी माझा पैसा घेऊन दुस-यांचा पैसा ओढायला जायचो, आणि दुसरेच माझा पैसा ओढत. मग कोणीतरी म्हणालं, 'अरे वेड्या, असं नसतं कधी. पैसा म्युच्युअल फंड मद्धे टाकावा, सगळ्यांचा पैसा एकत्र येतो आणि मग win-win situation होते, सगळेच जण पैसा कमावतात.' Makes sense :D.. पैसा म्युच्युअल फंड मद्धे टाकला.. सगळयांचा पैसा एकत्र आला, पण दुर्दैवाने दुस-या MF ने फायदा कमवला, आमचा सगळ्यांचा पैसा त्यांनी ओढला, दुस-या MF वाल्या सगळ्यांनीच पैसा कमावला.. त्यांच्यासाठी खरच win-win situation झाली. Think Contra.. अशीही एक शेअर-बाजाराची Strategy आहे.. म्हणजे काय तर तुम्हाला एख...