शाळेत असताना माझा सगळ्यात आवडता महिना होता तो मे महिना! कारणं तर सगळ्यांनाच माहिती आहेत. निकाल लागलेला असल्याने पुढच्या वर्गात जाण्याची खात्री असायची, घरात सगळे नातेवाईक, पाहुणे असल्याने खेळायला/उनाडक्या करायला अख्खी टोळी असायची, त्यावेळी तरी पुढच्या वर्गांच्या शिकवण्या/संस्कार वर्ग/उन्हाळी शिबिरं असले काही प्रकार नव्हते आणि ह्या सगळ्याला असायची ती कोकणाची पार्श्वभूमी. आंबे, फणस, काजू, जांभळं, करवंद ह्यांचा रतीब, गाज ऐकत वेळेवर फिरणं, किल्ले बांधणं, शंख-शिंपले गोळा करणं, उकाड्याने हैराण झालो की एखादे काका/मामा आइस्क्रीम खायला देतील ह्या आशेवर राहणं, वळवाच्या पावसात चिंब होणं हे सगळं मनोसोक्त भोगायचे ते दिवस होते.
इतक्या वर्षांनंतर परत मे महिन्यात कोकणात जायची संधी मिळाली.
मारामारी करून कोड अप्रूव्ह करून घेतला आणि सरळ गोवा गाडी पकडून कणकवली गाठली. तसंही महिन्यातून एकदा जाणं होतंच, पण ते २, जास्तीत जास्त ३ दिवस. ह्या वेळी अख्खा आठवडा हातात होता. २ दिवस सिंधु-महोत्सव बघत आराम केला. कार्यक्रम/आयोजन चांगलं होतं पण मागच्याच आठवड्यात नाट्यमहोत्सवाची धमाल केलेल्या नाट्यवेड्या (नाट्यरसिक नव्हे) कणकवलीकरांना त्याचं तेवढ कौतुक नव्हतं.
बुधवारी सरळ बाईक काढली आणि जास्त काही विचार न करता कुणकेश्वरकडे निघालो.
राणेसाहेबांच्या कृपेने रस्ता संपूर्ण डांबरी होता आणि बराही होता. ५०-६० चा वेग कायम ठेवून गाडी चालली होती. ह्या वेळी एकदम कोकणाच्या पोटात शिरायचं होतं, वाटाड्या म्हणून बाबा बरोबर होते. नोकरीनिमित्त त्यांनी सगळा जिल्हा पालथा घातला होता, त्यामुळे सगळा भुलभुलैय्या त्यांना ठावूक होता.
देवगड तालुक्यात शिरतानाच समोर येतो तो जिकडे तिकडे पसरलेला कातळ, किंबहुना अख्खा देवगड तालुका हा एकच कातळ आहे अधूनमधून थोडीफार माती असावी.

ना त्याच्यावर धो धो कोसळणा-या पावसाचा परिणाम होतो, ना तो दात ओठ खावून आदळणा-या अरबी समुद्राला भीक घालतो, पण जगप्रसिद्ध देवगड हापूसच्या गोडीला कारणही हाच कठोर कातळ आहे बरं. म्हणूनच प्रचंड मेहनत घेवून लोकांनी इथे मोठमोठ्या बागा केल्या आहेत. कुणकेश्वरचा रस्ता सोडून मधेच आम्ही ४ किलोमीटर पुढे पोखरबांवला गेलो.

इथे काही पांडवकालीन कुंडं आहेत आणि त्याच्या बाजूलाच शंकराचं, गणपतीचं मंदिर आहे. रखरखत्या उन्हातही कुंडात ब-यापैकी पाणी होतं. खाली उतरून गेलं की माणूस वेगळ्याच जगात पोचतो. अतिशय शांत आणि प्रसन्न वातावरण आणि कुंड/छॊटी गुहा ह्यांमुळे एक गारवा. आत्ता आत्ता मंदिराच बांधकाम चालू आहे. नाहीतर मागे ७-८ वर्षांपूर्वी गेलेलो तेव्हापर्यंत पांडवकालापासून काही बदल नव्हता ;).
तिथून मग परत कुणकेश्वराचा रस्ता पकडला. डोंगरावरूनच निळ्या समुद्राच्या पार्श्वभूमीवर, हिरव्या झाडीने वेढलेल्या

कुणकेश्वराचा पांढरा कळस दिसतो. आणि मग १-२ किलोमीटर घसरत गेलो की
श्री क्षेत्र कुणकेश्वर आपलं स्वागत करतं. देवाचं दर्शन घेतलं, 'देवा माझं कल्याण (मराठी बरं का, तमिळ नव्हे ;) ) कर' अशी प्रार्थना केली आणि किना-यावर गेलो. स्वच्छ पांढरी शुभ्र वाळू आणि लाल/काळे खडक. लोकं देखील फार नव्हती. बहुतेक सगळे भक्तच होते, पर्यटक जास्त कोणी दिसले नाहीत. गर्दी होती ती माडांचीच आणि गोंगाट फक्त लाटा आणि वा-याचा.
हे गावही फार लहान आहे. झाडांनी वेढलेली छोटी/छोटी कौलारू घरं, लाल माती आणि वळणावळणाचा रस्ता, एकूण वळणच कोकणी. जेवणासाठी छोटी-छोटी हॉटेलं आहेत, राहण्यासाठी मात्र फार जास्त सोयी नाहीत. देवस्थानाचा एक भक्तनिवास आहे तिथे ७०-८० लोकं, आणि मंदिरापासून थोडं दूर सरकारी पर्यटक निवास आहे तिथे थोडी लोकं एवढ्यांचीच व्यवस्था आहे. अनेक लोकांचं हे मोठं श्रद्धास्थान आहे. महाशिवरात्रीला अफाट गर्दी असते. त्यावेळी मात्र गावकरी राहायची व्यवस्था करतात.
जवळच मीठमुंबरी आहे, तिथल्या किना-यावरून देवगडच्या (बंद) पवनचक्क्या दिसतात.
मग समुद्राकाठचा रस्ता पकडून दक्षिण दिशा पकडली. पुढचा टप्पा होता मिठबांव. वडील बरेच वर्ष तिकडे होते. माझ्याही काही सुट्ट्या तिकडे गेल्या होत्या. मिठबांवचा किनारा पण असाच शांत आणि स्वच्छ होता. इथे कुठलातरी उद्योगसमूह पंचतारांकित हॉटेल टाकणार होता, पण मधेच त्याचे ग्रह-तारे कुठेतरी बिघडले. तसाही स्थानिक लोकांचा विरोध होताच. अहो एवढ्या लागणा-या आंबा, माडा-पोफळींच्या बागा टाकून विस्थापित होण्याची हौस कोणाला आहे? पण पिण्याच्या पाण्याची थोडीफार अडचण आहेच इकडे.
मस्त भूक लागली होती. गावात आलो आणि टपरीवजा हॉटेलात जेवणाची चौकशी केली तेव्हा कळालं की त्यांच्याकडे ५ दिवसांनी पाणी आलं होतं आणि पुढे कधी येईल ह्याची खात्री नव्हती. जेवणाचा बेत आपोआपच पुढे गेला.
पूर्वी मिठबांव म्हणजे समुद्रात घुसलेलं टोक होतं, खाडीपलिकडे मालवण तालुका. हल्लीच त्या खाडीवर मस्त ऐसपैस पूल झाला आहे. त्यामुळे जवळजवळ १००(एकावर दोन शून्यं) किलोमीटरचं अंतर वाचवून आम्ही आच-याला निघालो. आच-याच्या रामेश्वरावरही खूप लोकांची श्रद्धा आहे, पण आधी पोटोबा, मग विठोबा ह्या न्यायाने अगोदर जेवून घेतलं मग देवळात गेलो. ह्या देवस्थानाचं वाचनालय १०० वर्षांपेक्षाही जुनं आहे.

आता जायच होतं ते आच-याच्या बंदरावर.
आचरा बंदरावर जायला मधल्या दलदलीत भर टाकून केलेला अर्धा एक किलोमीटरचा पूलासारखा रस्ता आहे. रस्ता तसा पूर्वीही होताच. पण आता तो मस्त रुंद केला आहे. मधे मधे छोट्या चौपाट्याही केल्या आहेत आणि एखादं घर रंगवावं, तसा रंगवला आहे.
आच-याच्या किना-यावर पूर्वी माझ्या एका मित्राचे तंबू होते. त्यावेळी माझ्या कॉलेजमधले मित्र, विक्रम आणि

अमितबरोबर मी आलो होतो, ते दिवसही फार मिस होतात :( . सध्या तरी तिथे सामसूमच होती.
समुद्राला मात्र उधाण आलं होत. थोडा वेळ शांत बसलो. समुद्राचं रूप चार इंद्रियानी मनोसोक्त अनुभवलं (चव सोडून. कोकणात बरेच संत, विभूती झाल्या, पण कोणी समुद्राचं पाणी गोड केलेलं नाही, मुंबईचे बाबा त्यामानाने पॉवरबाज आहेत ;) ) इकडे तिकडे फोटो काढले. समुद्रात गेलेल्या होड्या यायला अजून बराच वेळ होता. त्यामुळे ताजे मासे घरी नेण्यासाठी फार वेळ थांबावं लागलं असतं.

त्या भानगडीत न पडता आम्ही गडनदीच्या कडेकडेने जाणारा परतीचा रस्ता पकडला. पावसात हा रस्ता अगदी अप्रतिम असतो, पण मे महिन्यातही नदीत पाणी होतं आणि बराच हिरवेपणाही होता.

तासाभरात घरी पोचलो.
पण मन मात्र किना-यावरंच भटकत राहिलेलं....